Wednesday 30 March 2016

वो भी एक दौर था, ये भी एक दौर है...

कपिल देव ग्रेट की इम्रान खान? कपिल चांगला ऑल-राउंडर की हॅडली? सचिन या युगाचा ब्रॅडमन आहे. सेहवाग हा प्रती-सचीन आहे. लारा हा फास्ट बॉलर्सना सचिनपेक्षा चांगल्या प्रकारे खेळू शकतो. युगानुयुगे अशी तुलना होत आलेली आहे. यातच सध्या नविन फॅड आलं आहे. काही बालघेवडे 'कोहली सचिनपेक्षा ग्रेट आहे', अशी तुलना करताहेत.

इतिहासात आपल्याकडे बरेच शूर, बलाढ्य सरसेनापती होऊन गेले. नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, आणि नंतर पेशवाईच्या काळात बाजीराव पेशवे. यांच्यापुढे कुठलाही गनीम टिकायचा नाही. कारण या प्रत्येकाचं कौशल्य, क्षमता, डावपेच वेगवेगळे होते. रणांगण या सर्वांनीच गाजवलं. कुणी शत्रुच्या गोटात घुसून मारलं, तर कुणी शत्रुला घेरुन मारलं. सर्वांचा महिमा अपरंपार. पण यांच्यात कधीही तुलना झाली नाही. संताजीची तलवार भारी की हंबीरराव मोहितेंचा वार भारी, अशी चर्चा झाली नाही.

सचिन आणि विराट दोघांची बॅटिंग शैली वेगळी. सचिन देवगड हापूस आहे, तर विराट अस्सल रत्नागिरी हापूस. सचिन चक्रीवादळ होतं, तर विराट ज्वालामुखी. सचिनने मारलेला शॉट कदाचित त्या बॉललासुद्धा सुखावह वाटायचा. कोहलीने मारलेला शॉट बॉलचं कंबरडं मोडतो. सचिनच्या कव्हर- ड्राइव्हमधे नजाकत होती, कोहलीच्या कव्हर-ड्राइव्हमधे मस्ती आणि रांगडेपणा असतो. सचिनचा पुल घड्याळ बघून व्यवस्थित ‘टायमिंग’नं बाउंड्रीच्या बाहेर जायचा, तर कोहलीचा पुल ‘टायमिंग’ची वाट न बघता प्रेक्षकांच्या गॅलरीत जाऊन पडतो. सचिनच्या स्ट्रेट-ड्राईव्हला फिल्डर काय, अंपायर सुद्धा जागचा हलायचा नाही. अंपायर न बघता फोर-रन्स असा सिग्नल द्यायचा. कोहलीनं मारलेल्या ऑन-ड्राइव्हला बॉलर, मिड-विकेट, आणि मिड-ऑन हे तिघेजण "फX-ऑफ, इट्स फोर" असा रिप्लाय देतात. बॉलरनं कितीही स्लेजिंग केलं तरी, डोक्यावर तीन-चार किलो बर्फ ठेवून शांतपणे पुढच्या बॉलवर सचिन चौकार मारायचा. त्याच्या विरुद्ध विराट. बॉलरनं चार शब्द पुटपुटले की तो शिव्यांची बाराखडी म्हणत तीन-चार सणसणीत चौकार हाणतो. क्रिकेट हे सचिनसाठी ‘पॅशन’ होतं तर विराटसाठी ते ‘ऍग्रेशन’ आहे.

आता प्रश्न आहे विजय मिळवून देण्याचा. सचिननं आपल्या कारकिर्दीत ब-याच वेळा घोड्याला (भारतीय टीमला) पाण्यापर्यंत (विजयासमीप) नेऊन ठेवलं होतं. पण या ना त्या कारणानं या घोड्याला जरा वाकून हे विजयाचं पाणी पिता आलं नाही. विराट आपल्या खेळीनं भारताला विजयाचं पाणी पाजल्याशिवाय हालत नाही. कदाचित तेव्हाच्या आणि आत्ताच्या घोडयामधे, सॉरी, टीममधे बराच फरक आहे. सचिन आऊट झाल्यावर, 'गेली मॅच' हा नेहमीचा डायलॉग असायचा. आज कोहली आऊट झाल्यावर रहाणे, रैना, धोनी यांच्या खेळीवर आपण आशा ठेवतो.

सचिननं आपल्यासारख्या क्रिकेटप्रेमींना ब-याच चांगल्या खेळींच्या आठवणी दिल्या आहेत. सचिनचे अनेक कट्टर चाहते आजही आहेत. ही कदाचित अतिशयोक्ती होईल, पण तरीही सचिनच्या कट्टर चाहत्याची छाती फाडली तर त्यात तुम्हाला सचिनच दिसेल.

जमाना बदलेल, खेळाडू बदलतील. परवा ब्रॅडमन होते, गावस्कर होते. काल सचिन होता. आज कोहली आहे. उद्या कदाचित आणखी कोणी सर्फराज वगैरे असेल. प्रत्येक खेळाडूची आपली एक ओळख असते, आपला एक विशिष्ट रुबाब असतो. त्याची तुलना होऊ शकत नाही.

इथे राजेश खन्ना साहेबांचा एक डायलॉग आठवतो -

"कल मैं था, आज कोई और है,
वो भी एक दौर था, ये भी एक दौर है..."

No comments:

Post a Comment